Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva
Showing posts with label Adikanya. Show all posts
Showing posts with label Adikanya. Show all posts

Mi Adivasi Bolatoy | मी आदिवासी बोलतोय ....


आज मी बोलणार आहे, इतकी वर्षे मनाला बोचणाऱ्या यातना सहन करून जगणारा मी. ढोरां सारखी मेहनत करून उपाशी मरणारा मी. जंगलाचा राजा असूनही बेघर असा मी. आज बोलणार आहे माझ्या सहनशक्तीचे बंध आता फुटलेत. मुग गिळून बसने आता केवळ अशक्यच !
काल सर्व भारतवासियांनी स्वातंत्रदिन उत्साहात साजरा केला, ... झेंडा वंदन, मिरवणूक, पताका........अगदी उत्साहात !
पण मी तुम्हाला विचारतो, आपण खरेच स्वतंत्र झालोत कि स्वातंत्र्याचा फक्त टेंभा मिरवतोय ?  ते इंग्रज होते ज्यांनी आपल्या देशावर राज्य केले. आणि ते क्रांतिकारी ज्यांनी  देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. पण आजचे काय खरेच गुलामगिरी संपलीखरेच स्वातंत्र्य आले.? अन कसले स्वातंत्र्य?
देशात बांगलादेशीयांना आश्रय देवून मुळवासी असलेल्या आमच्या जातबंधावाना त्यांच्या जागेवरून हुसकावून लावण्याचे स्वातंत्र्य नक्षलवादी सांगून छाताडावर गोळ्या घालण्याचे स्वातंत्र्य. आमच्या जमिनी हिस्कावताना आया बहिणींची अब्रू लुटण्याचे स्वातंत्र्य. ...कि आम्हाला मिळणाऱ्या सवलतींच्या जोरावर गाड्या फिरवण्याचे स्वातंत्र्य. कसले स्वातंत्र्य ..?
एकेकाळी जंगलाचा राजा मानला जाणारा मी आज लाचार कुणामुळे झालाय. कोण जबाबदार याला ..? भ्रष्टाचारी सरकार जे फक्त आकडे मोजून गरिबी कमी झाल्याच्या फुशारक्या मारते... आमच्या सवलतीवर स्वताचे खिसे गरम करणारे नेते.... कि आमच्या जमिनीवर रक्ताचे पाट वाहून राजमहाल बांधणारे सरकारचे दलाल, आमच्या समस्यांचे भांडवल करून स्वताची पोळी भाजणारे राजकारणी.... कि आम्हाला लाचार, बिच्चारे म्हणवणारे पांढरपेशी.... कोण कोण जबाबदार आहे ...?
कधी कुणावर विसंबून न राहिलेला मी आज लाचार का झालो ? ...आमच्या जमिनींवर, सवलतींवर डोळा ठेवणारे का फोफावलेत... आम्हाला जमीनदोस्त करून आमचे अस्तित्व मिटवू पाहणाऱ्यांची  वृत्ती का अधिकाधिक सोकावत चाललीय ...?
देशाचा सर्वात पहिला वासी मी. आज माझेच अस्तित्व धोक्यात आलेय न असे करणारे कोण.? माझेच देशबंधू ! मग मी स्वातंत्र्य कसा ?
एकीकडे लखलखत्या दुनियेत प्रगतीचे आकडे भराभर वाढत असताना. न महासत्ता बनण्याची स्वप्ने घडवणाऱ्या देशात आम्हाला पिण्याचे पाणी नशिबात नाही मग कसली प्रगती.? राकट देशा.. ,कणखर देशा....दगडांच्या देशा म्हणवणाऱ्या या देशात जंगलाच्या राजाची अशी केविलवाणी अवस्था असेल तर अशा स्वातंत्र्यापेक्षा इंग्रज बरे असे म्हटल्यास नवल ते काय !!
तर दुसरीकडे आमच्या जमिनी घशात घालण्यासाठी आमच्या जात बांधवांची खुलेआम कत्तल केली जातेय. त्यांना नक्षल वादी ठरवले जातेय. रोजच्या रोज नक्षल वाद्यांना मारल्याच्या बातम्या मोठ्या अभिमानाने सांगितले जातेय. मग नक्षलवाद संपत का नाही?  कारण मारले जाणारे माझे जात बांधव आहेत  नक्षलवादी नाही ...
प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या समाजाचे रक्षक म्हणवनारयांचे हे अघोरी कृत्य ! रक्षक हेच आमचे भक्षक बनल्यास स्वरक्षणासाठी आम्ही बंदुका का उचलू नयेत? जिथे आम्हाला पिण्याचे पाणी नाही तिथले सरकार मोफत मोबाईल वाटणी जाहीर करतो.. वा खरेच किती मोठी प्रगती आहे हि ..!
पैसा नाही, जमीन नाही, कि डोक्यावर छप्पर नाही, शिक्षण आहे ...ते फक्त कागदोपत्री आकड्यांवर... सवलतींवर नाग फना काढून बसलेले,अन सर्व धर्म समभाव मानणाऱ्या या देशात आदिवासी म्हणून हीन वागणूक देणाऱ्यांची संख्या पण कमी नाही, मग आम्ही जायचे कुठे ..?
जर असेचआमचे शोषण होत राहिले तर आमचे अस्तिवच नष्ट होयील आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्या लांडग्याची आग शमेल....थांबवा हा अन्याय ! अन्यथा आम्ही पेटून उठू, आणि आमच्यावर अन्याय करणार्यांना भस्म करू ! आमच्या सहनशक्तीचा अंत आता संपलाय ..... तेव्हा क्रांती झाली होती इंग्रजां विरुद्ध! आता हि एक क्रांती घडेल आमच्यावर अन्याय करणाऱ्या विरुद्ध.

- Sanchita Satvi 
Author @ Google

AYUSH | Adikanya | Group of tribal girls


नमस्कार!
मी आलेय.... तुमच्या भेटीला..... जगाच्या नवीन प्रवाहात सर्व आदिवासी भगिनींना एकत्र आणायला, यशाची खुणावणारी नवीन शिखरे संगनमताने सर करायला, आणि सर्व आदिवासी भगिनींना एकत्र आणून प्रगत व जागृत असा आदिवासी समाज घडवायला! आदिवासी संस्कृती स्त्री प्रधान संस्कृती आहे असे म्हंटले जाते.

मी कुणी दैवी शक्ती नाही कि चुटकी सरशी प्रगत समाज घडवायला किंवा चमत्कारही नाही, मी तुमच्यासारखीच आहे, तुमच्यातलीच आहे, आणि तुमच्यासाठीच आहे . मी आहे एक आदिकन्या! सख्यांनो ,आपण समाजाचा एक मुख्य आणि अनिवार्य घटक आहोत, हे विसरू नका, मग आपण मागे कश्या ? ज्या समाजातील स्त्री साक्षर आणि जागृत असते तो समाज नेहमीच पुढारलेला असतो .कारण एक स्त्री एक कुटुंब घडवत असते, जर स्त्री सक्षम असेल तर सक्षम कुटुंब घडते अन पर्यायाने एक सक्षम समाज !

बहुतेक कवितांमध्ये अथवा कथा कादंबऱ्या मध्ये स्त्रीचे वर्णन एक नाजूक, डौलदार आणि मन मोहवणारी कलात्मक वस्तू असे केलेले असते. अशा कविता ऐकायलाही खूप सुखावह वाटतात. पण खरेच स्त्री नाजूक आहे? असह्य अशा प्रसूती वेदना सहन करून नवीन जीव निर्माण करणारी स्त्री नाजूक कशी ? प्रसंगी हत्तीचे बळ आणून संसार उभारणारी व समोर आलेल्या संकटालाही लाजवेल एवढे धैर्य एकवटून त्याचा सामना करणारी स्त्री नाजूक नाही किवा मन मोहवणारी कलात्मक वस्तू नाही तर ती समाज घडवणारी शिल्पकार आहे .

आदिवासी स्त्रिया मुळातच काटक, जिद्दी , आणि भरपूर मेहनती .मग उगीचच लाचार होवून कोपऱ्यात का खितपत पडताय? आज आपल्यातल्या कित्येक भगीणींजवळ काहीना काही कौशल्ये असतात ,पण अज्ञान व संसाराच्या रहाटगाड्यात ते तसेच लयाला जाते. तुमचे कौशल्य ओळखून त्यांना वाव देण्यासाठीच मी आलेय . आपल्यातले धावण्याचे कौशल्य ओळखून व जीवनाचा खडतर प्रवासाचा सामना करून ऑलिम्पिक मध्ये स्वताचे व समाजाचे नाव उंचावणारी कविता राउत किंवा आपल्या चित्रांना जहांगीर कालादालानापर्यंत नेऊन पोचवणारी व आदिवासी समाज जीवनाची ओळख जगाला करून देणारी चित्रगंधा वनगा-सुतार हि आपल्यातल्याच आहेत हे विसरू नका ! मग आपण मागे का राहावे? सख्यांनो ,आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त प्राथमिक शिक्षण पुरेसे नाही, तर उच्च शिक्षणाची नितांन्त आवश्यकता आहे.उच्च शिक्षणाने यशाची नवी दालने तर उघड्तातच पण आपला आत्मविश्वासही उंचावतो ,आपल्यात एक नवीन धैर्य निर्माण होते.

शिका आणि शिकवा या उक्क्तीप्रमाणे आपण आपल्या सोबत समाजातील सर्व भगिनींना एकत्र आणून त्यांचे जीवनमान सुधारायचे आहे .हि आपली सामाजिक जबाबदारी आहे .शिक्षण आरोग्य ,संस्कृती ,पर्यावरण अशा काही प्रश्नांवर योग्य त्या चर्चेने उपाय योगून त्यावर अंमलबजावणी आहे.आपले शिक्षण व कौशल्य याचा उपयोग स्वताबरोबर समाजासाठी हि करून समाजाला नवी ओळख निर्माण करून द्यायची आहे . पण मी हे एकटीने नाही तर आपण सर्व भगिनींनी मिळून करायचे आहे .
मग येताय न सोबत.. नवीन व प्रगत आदिवासी समाज घडवायला !!....let us do it together !!!!

आम्ही आयुश’ च्या रुपानॆ हे कार्य करत आहोत. आयुश बद्द्ल थोडक्यात सांगायचे झालॆ तर
आयुश  म्हणजे आदिवासी तरुण एकत्र येऊन आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशा सोबतआपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सामाजिक यशा साठी आणि सामाजिक जाणीव करून देण्याचे प्रयत्न करतो आहोत. आपल्या अखंड आदिवासी एकता टिकवून आपल्या समाजाचे ऋण परत करण्या साठीचा प्रामाणिक प्रयत्न.

आयुश च्या ह्या क्षितीजभरारीला तुमच्याही सहकार्याच्या पंखाचॆ बळ मिळावॆ अशी आम्ही आशा करतो  अन नक्कीच सर्वांच्या सोबतीनॆ समाजाला पुढॆ नेण्यास मोलाचॆ कार्य करु शकतो.मग देणार ना साथ?  

या समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्या साठी येथे टिचकी मारा – www.in.adiyuva.in
आयुश | let us do it together” विषयी अधिक माहिती साठी येथे टिचकी मारा – www.do.adiyuva.in

Google Group : https://groups.google.com/forum/?fromgroups#!forum/adikanya
Author @ Google

Find us on Facebook