Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

आपल्या सर्वांमध्ये या न त्या रूपाने 'बिरसा' आहेत

आज भगवान बिरसा मुंडा यांची १३८वि जयंती सर्व आदिवासी बांधव दिमाखात साजरे करतील,बिरसा मुंडा यांच्या महान कार्याला सलाम करत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील,भाषणे देण्यात येतील दिवसा अखेर सर्व जन आपल्या मनात बिरसांना वंदन करत पुढची जयंती कशी साजरी करावी हे ठरवतील …? करणारच!...  का नाही कारण बिरसा मुंडा हे नावच आपल्या समाजासाठी इतके प्रेरणादायी आहे,मग त्यांची जयंती आपण नाय साजरी करणार तर कोण करणार …?
 आज प्रत्येक आदिवासी तरुण फेसबुक सारख्या माध्यमातून आपल्या मनात 'भगवान बिरसा मुंडा' यांना नमन करताना बघून खूप अभिमान वाटतोय ,आपल्या तरुणात पसरत असलेली हि जागरुकता खरेच समाजाच्या दृष्टीने हितावह आहे.
        भगवान बिरसा मुंडा हे आदिवासींच्या अधिकारांसाठी स्वाभिमानासाठी लढले अमर झाले,मातृभूमीच्या रक्षणासाठी ते झटले. समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी शस्त्र हाती घेतले.
        आज आपण स्वतंत्र असूनही गुलामासारखे वागवले जातोय,हे पाहून बिरासांनी पुन्हा अवतरावे असे वाटते,परंतु आपल्या एक लक्षात येतेय का कि आपल्यात 'बिरसा' आजही जिवंत आहेत, त्यांच्या विचारांच्या रुपात! आदिवासी समाजासाठी खऱ्या मनाने झटणारा प्रत्येक जण  'बिरसा' आहे . आदिवासींसाठी जागृती करणारा प्रसंगी मोर्चे बांधणी करून पोलिसांचा मार खाणारा,तर ज्ञान रुपी शस्र हाती घेवून कायद्याने आदिवासींसाठी लढणाराही बिरसाच आहे !
       इतकेच काय आपल्या सर्वांमध्ये या त्या रूपाने 'बिरसा' आहेत फक्त त्यांना ओळखणे आपल्यात लपलेल्या या 'बिरसा' रुपी विचारांना कृतीत उतरवण्याची गरज आहे . केवळ आजच्याच दिवशी नाही, तर रोजच बिरासांचे नमन करुयात  ,त्यांच्या विचारांचे अवलोकन रोजच केले तर ती त्यांना खरी सलामी असेल.
        आपल्या तरुण पिढीला बाकीचा इतिहास तोंडपाठ असतो परंतु आपल्या आदिवासी विरांबद्दल फारशी माहिती नसते,आपण शिकलेल्यांनी पुढे येवून जर हा इतिहास पुढे आणला तर, आपल्या आदिवासी वीरांच्या महान कार्याला सलामी ठरेल   येणाऱ्या पिढीला हा ज्ञानकोश उपलब्ध करून देउ  शकतात . केवळ बिरसाच नाही तर असे अनेक क्रांतिवीर होऊन गेले,जे आपल्या समाजासाठी झटले ,त्यांचा इतिहास आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
       केवळ आजच्या दिवशी बिरसांच्या कार्याला सलामी करण्यापेक्षा बिरसांच्या विचारांना कृतीत उतरवून त्यांना रोजच सलामी देउयात. बिरासांची आज आपल्या समाजाला खरेच गरज असताना आपल्यातील प्रत्येक जण जर 'बिरसा' झाला तर खरोखरच 'उलगुलान' होईल! आणि 'आपण सुरु केलेल्या उलगुलान चा कधीच अंत होणार नाही' हा बिरसांचा विश्वास सार्थकी लागेल. यासाठी प्रत्येकाने शस्र घेवून मैदानात उतरणे शक्य नसले, तरी जे आपणाकडून शक्य होईल ते आपल्या समाजासाठी करणे गरजेचे आहे .
     भगवान बिरसा मुंडा हे आपले नायक आहेत,आज या नायकाला त्यांच्या १३८ व्या जयंती निमित्त नमन करून आपल्या समाजासाठी बिरसांसारखे कार्य करण्याचा प्रण करूयात !


-    संचिता सातवी

Find us on Facebook