Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

Mi Adivasi Bolatoy | मी आदिवासी बोलतोय ....


आज मी बोलणार आहे, इतकी वर्षे मनाला बोचणाऱ्या यातना सहन करून जगणारा मी. ढोरां सारखी मेहनत करून उपाशी मरणारा मी. जंगलाचा राजा असूनही बेघर असा मी. आज बोलणार आहे माझ्या सहनशक्तीचे बंध आता फुटलेत. मुग गिळून बसने आता केवळ अशक्यच !
काल सर्व भारतवासियांनी स्वातंत्रदिन उत्साहात साजरा केला, ... झेंडा वंदन, मिरवणूक, पताका........अगदी उत्साहात !
पण मी तुम्हाला विचारतो, आपण खरेच स्वतंत्र झालोत कि स्वातंत्र्याचा फक्त टेंभा मिरवतोय ?  ते इंग्रज होते ज्यांनी आपल्या देशावर राज्य केले. आणि ते क्रांतिकारी ज्यांनी  देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. पण आजचे काय खरेच गुलामगिरी संपलीखरेच स्वातंत्र्य आले.? अन कसले स्वातंत्र्य?
देशात बांगलादेशीयांना आश्रय देवून मुळवासी असलेल्या आमच्या जातबंधावाना त्यांच्या जागेवरून हुसकावून लावण्याचे स्वातंत्र्य नक्षलवादी सांगून छाताडावर गोळ्या घालण्याचे स्वातंत्र्य. आमच्या जमिनी हिस्कावताना आया बहिणींची अब्रू लुटण्याचे स्वातंत्र्य. ...कि आम्हाला मिळणाऱ्या सवलतींच्या जोरावर गाड्या फिरवण्याचे स्वातंत्र्य. कसले स्वातंत्र्य ..?
एकेकाळी जंगलाचा राजा मानला जाणारा मी आज लाचार कुणामुळे झालाय. कोण जबाबदार याला ..? भ्रष्टाचारी सरकार जे फक्त आकडे मोजून गरिबी कमी झाल्याच्या फुशारक्या मारते... आमच्या सवलतीवर स्वताचे खिसे गरम करणारे नेते.... कि आमच्या जमिनीवर रक्ताचे पाट वाहून राजमहाल बांधणारे सरकारचे दलाल, आमच्या समस्यांचे भांडवल करून स्वताची पोळी भाजणारे राजकारणी.... कि आम्हाला लाचार, बिच्चारे म्हणवणारे पांढरपेशी.... कोण कोण जबाबदार आहे ...?
कधी कुणावर विसंबून न राहिलेला मी आज लाचार का झालो ? ...आमच्या जमिनींवर, सवलतींवर डोळा ठेवणारे का फोफावलेत... आम्हाला जमीनदोस्त करून आमचे अस्तित्व मिटवू पाहणाऱ्यांची  वृत्ती का अधिकाधिक सोकावत चाललीय ...?
देशाचा सर्वात पहिला वासी मी. आज माझेच अस्तित्व धोक्यात आलेय न असे करणारे कोण.? माझेच देशबंधू ! मग मी स्वातंत्र्य कसा ?
एकीकडे लखलखत्या दुनियेत प्रगतीचे आकडे भराभर वाढत असताना. न महासत्ता बनण्याची स्वप्ने घडवणाऱ्या देशात आम्हाला पिण्याचे पाणी नशिबात नाही मग कसली प्रगती.? राकट देशा.. ,कणखर देशा....दगडांच्या देशा म्हणवणाऱ्या या देशात जंगलाच्या राजाची अशी केविलवाणी अवस्था असेल तर अशा स्वातंत्र्यापेक्षा इंग्रज बरे असे म्हटल्यास नवल ते काय !!
तर दुसरीकडे आमच्या जमिनी घशात घालण्यासाठी आमच्या जात बांधवांची खुलेआम कत्तल केली जातेय. त्यांना नक्षल वादी ठरवले जातेय. रोजच्या रोज नक्षल वाद्यांना मारल्याच्या बातम्या मोठ्या अभिमानाने सांगितले जातेय. मग नक्षलवाद संपत का नाही?  कारण मारले जाणारे माझे जात बांधव आहेत  नक्षलवादी नाही ...
प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या समाजाचे रक्षक म्हणवनारयांचे हे अघोरी कृत्य ! रक्षक हेच आमचे भक्षक बनल्यास स्वरक्षणासाठी आम्ही बंदुका का उचलू नयेत? जिथे आम्हाला पिण्याचे पाणी नाही तिथले सरकार मोफत मोबाईल वाटणी जाहीर करतो.. वा खरेच किती मोठी प्रगती आहे हि ..!
पैसा नाही, जमीन नाही, कि डोक्यावर छप्पर नाही, शिक्षण आहे ...ते फक्त कागदोपत्री आकड्यांवर... सवलतींवर नाग फना काढून बसलेले,अन सर्व धर्म समभाव मानणाऱ्या या देशात आदिवासी म्हणून हीन वागणूक देणाऱ्यांची संख्या पण कमी नाही, मग आम्ही जायचे कुठे ..?
जर असेचआमचे शोषण होत राहिले तर आमचे अस्तिवच नष्ट होयील आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्या लांडग्याची आग शमेल....थांबवा हा अन्याय ! अन्यथा आम्ही पेटून उठू, आणि आमच्यावर अन्याय करणार्यांना भस्म करू ! आमच्या सहनशक्तीचा अंत आता संपलाय ..... तेव्हा क्रांती झाली होती इंग्रजां विरुद्ध! आता हि एक क्रांती घडेल आमच्यावर अन्याय करणाऱ्या विरुद्ध.

- Sanchita Satvi 
Author @ Google

Find us on Facebook